Tuesday, June 2, 2020

भंडारदरा - लोकजीवन

भंडारदरा - लोकजीवन 

भंडारदरा - महाराष्ट्रातील स्वर्ग अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.पश्चिम घाटाचा हा परिसर आणि त्याच सौदर्य अमाप आहे. महाराष्ट्राला हि मोठी निसर्गाने दिलेली देणगीच म्हणता येईल.
भंडारदरा परिसर जरी निसर्गसंपन्न असला तरी विकासाच्या दृष्टीने अजूनही मागेच आहे.इथे राहणारे आदिवासी आणि इतर बांधव अजूनही मुळ गराजांपासून वंचित.तरीदेखील हि लोक इथे एकदम सुखात राहतात.यांचं मुख्य उत्पन्न म्हणजे भात याला कारण एकच इथे पडणारा पाऊस.

पावसाचा काहीं काळ सोडला तर बाकी इतर महिने यांच्यासाठी कठीण असतात.सध्या पुण्या मुंबई वरून विकेंड ला येनर्याचा ओघ इकडे बराच वाढलाय आणि त्याचाच फायदा घेत इथे २-४ पैसे हे लोक पावसाळी पर्यटनातून कमावतात.

हा फोटो म्हणजे भंडारदरा परिसरातील एका शेतात राखण करणाऱ्या मुलीचा.मागे दिसणारा भंडारदरा जलाशय.
मुलीच्या कपड्यावरून कल्पना करता येईल की शाळेचा गणवेश . हाच दिवसभर घालून दिवस काढायचा.
शहरी लोकांसारखे दिवसातून २-३ ड्रेस सकाळ संध्याकाळ रात्र या प्रमाणे यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात.म्हणून आहे त्यात ही लोक आनंद मानतात.

अठरा विश्व दारिद्र्य असूनदेखील चेहऱ्यावरील हास्य कमी होऊ न देणारी हि लोक कोरोना सारख्या कठीण काळात जगण्याची ऊर्जा देऊन जातात.

आयुष्य सुंदर आहे ☺️ 

फोटो साभार - ऋषिकेश जाधव 

Tuesday, March 10, 2020

गोदाकाठ- नाशिक

नाशिक एक स्वछ आणि सुंदर शहर,याची खरी सुंदरता अनुभवायची असेल तर ती रात्री देखील अनुभवता येते. शहरात येणार प्रत्येक भटका किंवा पाहुणा हा पंचवटी परिसराला भेट दिल्याखेरीज जात नाही.सहसा दिवसभर हा गोदावरी चा परिसर खूपच भाविकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. मनात आले कि रात्री हा कसा असेल किंवा निर्मनुष्य असल्यावर कसा दिसेल म्हणून एके दिवशी रात्री १२ नंतर गोदातिरेवर गेलो. एक वेगळं आयुष्य अनुभवत होतो. ज्यांना कुणाला निवारा नाही अश्या असंख्य लोकांची किंवा कामानिमित्त शहरात आलेल्यांची, अपंग लोकांची, दारिद्र्य रेषेखालील लोकांची निवार्याची सोय हा परिसर करत असतो. शेकडो कुटुंब या परिसरात तुम्हाला रात्री थिरावलेले दिसतील. असाच एक माणूस  निवांत निद्रावस्तेथ असताना चा हा फोटो मला खूपच भावला आणि लगेचच बर्याचश्या गोष्टींचा उलगडा डोळ्यासमोर आला.
Copyright of Photograph - Mr.Amol N Deshmukh

खान्देशातील दुर्गवैभव - किल्ले चौगाव


खान्देशातील विशेषकरून पूर्व खान्देशातील ( जळगाव जिल्ह्यातील ) किल्ल्यांवर फारसे कोणी लिहिलेले नाही.राजदेहेर,पारोळा व अमळनेरवरच फारच थोडे लिहिले गेले.त्यामुळे जिल्ह्यातील माहिती वाचकांना नाही.
जिल्ह्यात जे काही किल्ले आहेत ते एकतर गवळीराजकालीन (आभिरकालीन),फारुकीकालीन व पेशव्यांच्या उत्तरकाळातील आहेत. त्यामुळे बहमनी , आदिलशाही व निजामशाहीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जसे मोठाले किल्ले बांधले गेले आहेत तसे जळगाव जिल्ह्यात नाहीत. जिल्ह्यात एकूण २७-२८ किल्ले-गढ्या आहेत. यांच्यावर घडामोडी घडल्याच नाहीत, असे नाही. यातील १२ किल्ल्यांवर तर ब्रीतीशांशी चकमकी झालेल्या आहेत.
इ.स. १८१८ मध्ये ब्रिग्ज याला खानदेशाचा कमिशनर नेमल्यानंतर त्याने खानदेशाचा सर्व भाग आपल्या पायाखाली घातला. त्याने “दि लाईफ एंड कॅन्डीशन ऑफ खान्देश पिपल” या नावाचा एक मोठा अहवाल तयार केला आणि तो मुंबई च्या गोवेर्नेर ला पाठविला. यात ब्रिग्ज लिहितो कि खान्देश चा इतिहास हा फारसा लिखित स्वरुपात उपलब्द नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांना महत्व आले;पण खान्देशमधील सर्व गिरिदुर्ग हे यादव किवा यादवपूर्वकालीन आहेत.बहामनी काळात हे किल्ले आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बराच संघर्ष खान्देश भागात झालेला आपणास दिसून येतो. या संघर्षाचे काही उल्लेख मुसलमानी इतिहासकारांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथात आपणास आढळतात; परुंतू दुर्दैवाने या गोष्टींचे फारसे संशोधन झाले नाही.धुळे,जळगाव,नंदुरबार जिल्ह्यातील किल्ले,गढ्या आणि तेथील इतिहास हा सतत उपेक्षितच राहिला.
खान्देशातीत विशेषता जळगाव जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यांमध्ये प्राचीन असा किल्ला म्हणजे चौगाव चा किल्ला. दक्षिणेतून मध्यप्रदेशात ( नेमाडत ) जाणार्या मार्गावरील हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा तर आहेच;परंतु उत्तर,मध्यप्रांतातून दक्षिणेतील सुरत, भडोच बंदरातून भारताबाहेर निर्यात होणार्या मालासाठी बाजारपेठ म्हणूनही चौगावाचे महत्व वर्णन केले आहे.
गडवाट परिवाराच्या वतीने यंदा राज्यभरात विभागावर किल्ल्यांवर वृक्षारोपण आयोजित केले होते. जळगाव विभागात दुर्लक्षित अश्या चौगाव किल्ल्याची माहिती मिळाली आणि लगेचच किल्ल्याला जायचं ठरलं.
किल्ल्याच्या पायथ्याला चौगाव वसलेले आहे . जळगाव जील्यातील चोपडा तालुक्यात वायव्येस ११ किमी लांब चौगाव येत.या गावाजवळ सातपुडा पर्वत येतो,पर्वताच्या दक्षिणेकडे आलेल्या एका सुळक्यावर गवळी राजवटीतील प्राचीन किल्ला आहे. तो मध्य प्रदेशात ( नेमाडत ) जाणर्या अतिप्राचीन भिराट घाट या डोंगरी मार्गावर आहे. गडाच्या पायथ्याशी तीन नद्या वा नाले एकत्र येऊन मिळतात.तेथे प्राचीन महादेवाचे मंदिर होते आता त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराजवळ सपाट जागेवर दगड विटांचे ढिगारे दिसतात.पूर्वीच्या काळी बहुतेक किल्ल्यांच्या खाली असे बाजारहाटाचे केंद्र आढळून येई.गडाच्या उजव्या व डाव्या बाजूस मोठ्या चीपात्या,बांदरा बल्ल्या ,लेभाग डोंगर ,काली टेकडी , मास्तरना बल्ल्या ( अहिराणी भाषेत बल्ल्या म्हणजे डोंगर )हे सातपुडा रांगेतील डोंगर आहेत.किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. एक दक्षिणेकडे गडावर चढतांना दक्षिण दरवाजा चटकन लक्षात येणार नाही अश्या रीतीने तो बांधला आहे. हा दरवाजा अजून शाबूत आहे. दरवाज्याच्या बाहेरील बाजूस संरक्षक तटभिंतीत एक मोठे खोदीव टाके आहे .हे पाण्याचे टाके पुरातन लेणे असावे. लेण्यात एका रांगेत तीन स्तंभ अश्या समोरील दोन स्तंभावल्या दिसतात. अंधारामुळे आतील काहीच दिसत नसल्यामुळे आणखी किती स्तंभ मागे आहेत हे समजू शकत नाही. या स्तंभांनी छतास आधार दिलेला आहे .
गडावर दोन वाद्यांचे अवशेष आहेत. दक्षिण प्रवेशद्वारातून डाव्या बाजूस एका वाड्याचे चौथरे दिसतात.हा वाडा डोंगराच्या कडेवर असल्यामुळे येथून खालील प्रदेशाचे दृष्य मनोहारी दिसते. वाड्यास लागून एक हौद व एका देवीच्या देवळाचा चौथरा आहे . या वाड्याच्या बाजूने पुढे गेल्यास चार खोदीव टाक्यांचा समूह दिसून येतो. या टाक्यांमध्ये पाणी काठोकाठ भरलेले असते. त्यामुळे गडावरील वस्ती व शिबंदिस पाणी मुबलक प्रमाणात मिळत असावे .टाक्यांच्या पुढे गेल्यावर एक प्रशस्त ( सुमारे ५० मी लांब x २५ मी रुंद ) असा एक वाडा आहे .त्यास गवळीवाडा असे म्हणतात . वाड्याच्या चहुबाजूने भिंती शाबूत असून वरचे छत तेवढे आज शिल्लक नाही. छताच्या या भिंतीच्या अगदी वर हवा ये जा करण्यासाठी केलेली सोय वाखाणण्यासारखी आहे. वाड्याचे प्रवेशद्वार विचित्र आहे.समोरून वाड्यातील काहीही दिसणार नाही, अशी त्याची रचना आहे. वाड्यासमोरील मोकळ्या जागेत १९७७ मध्ये ६ फुट लांबीच्या चार जुन्या तोफा सापडल्या असून त्या सध्या चोपडा तहसीलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत. वाड्याच्या  उत्तरेला उत्तर दरवाजा दिसून येतो .पडक्या अवस्थेत असला तरी बर्यापैकी शाबूत आहे .
किल्ल्यातील वस्तूंचा संशोधनात्मक अभ्यास केल्यास बर्याच गोष्टीचा आणि अपरिचित इतिहासावर प्रकाश पडू शकतो .

किल्ला चढायला सोपा असून पायथ्यापासून चढाई साठी ४० मिनिट लागतात. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे सोबत मुबलक पाणी असणे आवश्यक आहे.
किल्ल्याला भेट द्यायची असल्यास जळगाव वरून चोपडा मार्गे चौगाव ला येऊ शकतात. पायथ्याला असलेल्या गावात जेवणाची सोय होऊ शकते. किल्ला पूर्ण बघायला २ ३ तास वेळ लागतो.
अश्या या अपरिचित किल्ल्यास अभ्यासक मंडळीनी नक्की भेट द्यायला हवी.  
अमोल देशमुख












भविष्यातील संगणक तंत्रज्ञान

आज आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तंत्रज्ञान चा संबंध हा येत असतोच. सुरुवात हि भ्रमणध्वनी पासून होते. अन्न वस्त्र आणि निवारा सोबतच भ्रमणध्वनी आणि इंटरनेट हि माणसाची गरजच बनून गेली आहे. बर्याच आवश्यक गोष्टी आपण घरबसल्या अगदी काही क्षणात भ्रमणध्वनी च्या सहाय्याने पूर्ण करू शकतो.सोबतच फोर जी सारख्या तंत्रज्ञान आज सहजरीत्या भारतात शहरी आणि खेडोपाडी आल्याने एक वेगळी क्रांती झाल्याच आपल्याला दिसून येते. गेल्या दहा पंधरा वर्षात तंत्रज्ञान ज्या झपाट्याने वाढत जात आहे त्याचा वेग बघता माणूस विकासाच्या एका वेगळ्या पातळीवर येऊन पोचला आहे.
या तंत्रज्ञान चा फायदा हा देशाच्या तळागाळातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी व्हायला होणे गरजचे आहे आणि तेच या तंत्रज्ञान चे फलित असले पाहिजे.
संगणक हा देखील मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होऊ पहात आहे किबहुना झालाच आहे असे आपण म्हणू शकतो. आणि संगणक क्षेत्रात जालेल्या तंत्रज्ञान बदलामुळे आज जग एका वेगळ्या वळणावर येऊन पोचले आहे. आज शिक्षण असो किवा विज्ञान,सरकारी क्षेत्र, बँक,खाजगी नोकरी,वैद्यकीय क्षेत्र ,कला आणि क्रीडा,साहित्य,खेळ,वेगवेगळ्या अवकाश मिहीमा,अणु उर्जा अगदी प्रत्येक क्षेत्रात संगणक तंत्रज्ञान येऊन पोचले आहे. यातच भर म्हणून भविष्यात येणर्या तंत्रज्ञान मुळे मनुष्यप्राणी हा आपल्या प्रगतीचे आलेख अधिकाधिक उंचावणार आहे. अगदी आपल्या काल्पनेपलीकडील गोष्टी ज्या कधीकाळी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी शक्य करण्याच काम या तंत्रज्ञान ने केलं आहे किबहुना भविष्यात अजून करणार आहे.
अश्याच काही भविष्यात येणाऱ्या निवडक संगणक तंत्रज्ञान ज्यामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडून येतील या बद्दल आपण बोलूयात
पाहिलं महत्वाच तंत्रज्ञान म्हणजे  Internet of things
यात जीवनावश्यक असलेल्या प्रत्येक वस्तू या सेन्सोर च्या मदतीने इंटरनेट शी जोडल्या जातील आणि मानवाच्या सहभागाविना काही गोष्टी पूर्ण करता येतील. जसे कि स्मार्ट होम ( हुशार घर ) ज्यात घराची सुरक्षा,घरात वापरल्या जाणार्या चैनीच्या वस्तू चालू बंद करण्याच नियोजन हे तंत्रज्ञान आपोआप करेल यामुळे घरात वापरली जाणारी उर्जा वाचविली जाऊ शकणार आहे.
हे तंत्रज्ञान फक्त घरगुती वापरासाठी मर्यदित न राहता ते वेगवेगळ्या क्षेत्रात वापरले जाऊ शकत आणि हे वापरात देखील येत आहे जसे कि कृषी क्षेत्र,बांधकाम,सुरक्षा,दळणवळण,भारतीय भूदल,वैद्यकीय क्षेत्र,उद्योग,उर्जा व्यवस्थापन,पर्यवरण संतुलन  इत्यादी.
दुसरं आणि अत्यंत महत्वाचे तंत्रज्ञान म्हणजे artificial intelligence ज्यालाच machine learning सुद्धा म्हटले जाते. यात यंत्र हे मानवाप्रमाणे विचार करू शकतात आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्या परीने शोधू शकतात. हे एका प्रकारे चमत्कारी आहे. यावर बर्याच खाजगी संस्था सध्या काम करत आहेत. भारतात देखील काही शाळामध्ये मुलांना शिकविण्यासाठी रोबोट वापरले जात आहेत ज्यात हे तंत्रज्ञान वापरले जात आहे.याचे फायदे हे बर्याच क्षेत्रांना होणार आहेत जसे कि संगणक खेळ,खागोल्शाश्त्र,औषध,वाहतूक ,कृषी ,शिक्षण,करमणूक ,माहिती तंत्रज्ञान,सामजिक मध्यम,नेक इत्यादी.आणि याच्या सीमा या अधिकाधिक विस्तारत आहेत.
पुढील काळात मानवासोबत रोबोट म्हणजेच कृत्रिम मानवी यंत्र काम करेल, माणसासोबत वेळ व्यतीत करेल. मानवाला असलेल्या भावना,भाव ते प्रकट करू शकेल.पुढील येत्या काळात युवा वर्ग आपला सहचारी म्हणून देखील या यंत्राचा वापर करतील.
जगभरातील मोठमोठ्या खाजगी कंपन्या यावर काम करीत आहेत.भारतीय संगणक क्षेत्रात देखील या तंत्रज्ञान चा प्रभाव येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणत दिसून येणार आहे.

पुढील तंत्रज्ञान म्हणजे बिग डाटा
पुढील येत्या काळात डेटा म्हणजेच माहिती हे खूप मोठा कामगिरी पार पडणार आहे.बिग डेटा म्हणजेच प्रचंड मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली  माहिती. याच माहितीवर प्रक्रिया करून अपेक्षित निकाल मिळविणे म्हणजेच बिग डेटा analitics.हि प्रचंड प्रमाणात साठविलेली माहिती या आधी असलेल्या संगणकावर प्रकिया करणे अशक्य होते फेसबुक ,ओर्याकल ,गुगल ,अमेझोन सारख्या मोठ्मोत्या कंपन्या या क्षेतात काम करत आहेत. भविष्यात यात नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणत उपलब्ध होणार आहेत.
बिग डाटा हे भविष्यात किबहुना आताच वैद्यकीय ,हॉटेल ,सार्वजनिक सुविधा क्षेत्र,सरकारी ,शिक्षण,करमणूक,हवामान अंदाज,दळणवळण,बँक इत्यादी क्षेत्रात वापरले जाईल.
गुगल फेसबुक,इंस्ताग्राम सारख्या कंपन्या आपल्या वयक्तिक माहितीचा वापर करून आपल्या आवडी निवडी ठरवतील आणि अश्याच वस्तू एखाद्या विशिष्ट संकेत स्थळावरून आपल्याला विकत घेण्यास भाग पडतील.याचे उत्तम उदाहरण म्हणजे youtube उघडल्या उघडल्या दिसणारे विदिओ. आपल्याला जे आवडत तेच आपल्या समोर मांडल जाईल. या सगळ्या गोष्टी आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करून केल्या जातात त्याला संगणकी भाषेत डाटा analytics म्हणतात.
Augmented Reality म्हणजेच वर्धित वास्तव 
या तंत्रज्ञानात वास्तविक जग आणि cyberspace म्हणजेच इंटरनेट एकमेक्कांना संलग्नित केलं जाईल.यात भ्रमणध्वनी असलेले gps तंत्रज्ञान आणि माहिती यांचा वापर करून tablet किवा भ्रमणध्वनी च्या सहाय्याने आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण बघू शकतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे रिकाम्या घरात शोभेच्या वस्तू घ्यायच्या असतील तर tablet वर त्या वस्तू घरात कश्या दिसतील हे तुम्हाला दिसून येईल. जेणेकरून तुम्ही ते खरेदी करू शकता.याचप्रमाणे एखादी इमारत ,व्यक्ती किवा इतर काही माहिती तुम्हाला याद्वारे अचूक मिळू शकेल.

याचबरोबर genetic इंगीनीरिंग, quantum computing सारखे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणत विकसित आणि वापरात येतील.यामुळे वेळ,पैसा आणि मेहनत या तीनही गोष्टी मध्ये बचत होऊ शकेल.5g-6g तंत्रज्ञान मुळे जग अधिक वेगाने एकमेकांशी जोडलं जाईल आणि तंत्रज्ञान अधिकाधिक वेगाने विकसित होईल.२०२१ मध्ये अमेरिकेत पहिला रोबोट येईल जो औषधं उत्पादन कंपनी मध्ये काम करेल.२०२२ पर्यंत जगातील १० टक्के लोकसंक्या इंटरनेट शी जोडले जाणारे कपडे वापरतील.3d प्रिंटींग तंत्रज्ञान वापरून बनविलेल्या चारचाकी २०२२ पर्यंत बाजारात येतील.माणसाच्या शरीरात मुद्रित केलेला पहिला मोबाईल २०२३ मध्ये वापरत येईल.सरकार आपल्या जनगणनेत बिग deta चा पवापर सुरु करेल.२०२३ पर्यंत १० टक्के चष्मे इंटरनेट शी जोडले जातील.सरकार कर आकारणी साठी ब्लोक चेन तंत्रज्ञान वापरेल.२०२३ पर्यंत जगातील ९० टक्के लोकांकडे सुपेर्कॉम्पुतर असेल.२०२४ पर्यंत इंटरनेट चा वापर हा मानवाचा मुलभूत अधिकार असेल.३ओ टक्के corporate audit हे artificial intelligence च्या सहाय्याने केले जाईल.जागतिक स्तरावर केल्या जाणार्या यात्रा या उबेर सारख्या माध्यमांद्वारे शरिंग (sharing)करून केल्याजातील.खाजगी वाहनाचा वापर कमी होईल. असे बरेच उदाहरण देता येतील.या सगळ्यांमध्ये संगणकाचा मोठा हातभार असेलच.संगणकाशिवाय हे तंत्रज्ञान विकसिक होण मुश्कील आहे. मानवी जीवनात क्रांती घडून आणण्याच काम वरील तंत्रज्ञान करतील पण महत्वाच म्हणजे हे जेवढ सुखकारक आहे तेवढंच धोक्याची घंटा देणार सुद्धा आहे.
या येणाऱ्या तंत्रज्ञान मुळे बर्याच नोकर्या जातील. मानवाची जागा रोबोट घेतील. ज्यांना कुणाला तंत्रज्ञान माहिती असेल किवा हाताळता येईल त्यांना नोकरी च्या सुवर्णसंध्या भविष्यात असतील.संगणक तंत्रज्ञान भविष्यात मानवासाठी वरदान घेऊन येतील. फक्त याचा वापर समाजातील गरीब , वंचित लोकांचे जीवनमान,शिक्षण आणि इतर संधी उपलब्ध होण्यासाठी झाला तर माणूस खर्या अर्थाने प्रगत झाला किवा होईल असे आपण म्हणू शकू.
भारत देखील जागतिक पातळीवर प्रगतीपथावर आहेच आणि संगणक क्षेत्रात तर अग्रेसर आहेच आहे आणि भविष्यात सुद्धा राहील.
अमोल नंदकिशोर देशमुख
९९७०३९८६१६
नाशिक 

Saturday, July 30, 2016

हेमाडपंथी मुधाई देवी मंदिर, श्री क्षेत्र वालझिरी , यावल अभयारण्यात पाटणादेवी मंदिर, धबधबा आणि प्राचीन पितळखोरे लेण्या

पावसाळा म्हटला म्हणजे नेहमीच ओढ असते ती भटकंतीची. यंदा पावसाची चांगलीच कृपादृष्टी खान्देशावर असल्यामुळे सभोवतालचा परिसर हिरवाईने नटलेला दिसतोय. मग रविवारच्या सुट्टीचे काहीतरी सार्थक व्हावे म्हणून आम्ही ६ मित्र (कैलास पाटील,स्वप्नील देशमुख ,राहुल तमखाने,वाल्मिक चित्ते,जितेंद्र वडदकर आणि मी)मिळून चार चाकीने सहलीचे नियोजन केले. जळगाव पासून जवळच असलेल्या वाघळी येथील हेमाडपंथी मुधाई देवी मंदिर, श्री क्षेत्र वालझिरी पुढे चाळीसगाव वरून यावल अभयारण्यात पाटणादेवी मंदिर,तेथील प्रमुख आकर्षण असलेला धबधबा आणि नंतर जंगलातून वर  चढून गेल्यावर असलेल्या प्राचीन पितळखोरे लेण्या. असा प्रवासाचा मार्ग निश्चित करून रविवार दिनांक १६ जुलै रोजी सकाळीच जितेंद्र च्या चारचाकीने जळगाव वरून जाण्यास प्रस्थान केले. 
जळगाव वरून पुढे गेल्यावर पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा धरणी मातेने जणू हिरवा शालू नसल्याचे चित्र दिसत होते. कॅमेरा नेहमीप्रमाणे सोबतीला होताच, खिडकीजवळ मागे बसून मी सगळे मित्र, गाडीत चालू असलेलें जुने गाणे, मधेच जुन्या आठवणीत अचानक उडणारे हास्याचे फवारे, गाडीत येणार गार वारा हे सगळं एक वेगळाच आनंद आणि मानसिक समाधान देत होत. 
क्षणात एक दीड  तास कसा निघून गेला कळाले नाही. पुढे पनीर पार केल्यानंतर चाळीसगाव रस्त्याला लागूनच डाव्या बाजूने लागून एक प्राचीन मंदिर लगेच दिसून येते. हे मंदिर म्हणजे वाघळी येथील मुधाई देवी मंदिर. गाडी मंदिराजवळ लावून लगेचच आम्ही मंदिर बघण्यास सुरुवात केली. 

हे मंदिर एका आंशिक रूपाने नष्ट झालेल्या कृत्रिम दगडावर बांधलेले आहे. याचे बांधकाम इ स ११५० ते १२०० च्या आसपास केले गेले असावे. या पूर्वमुखी मंदिराची ताऱ्याच्या आकाराचे विधान असून त्यात एक गर्भगृह,अर्धमंडप व मंडपाची योजना आहे. या मंदिराचे पीठ,वेदिबंध तसेच जांघेचा भाग सुरक्षित असून शिखर नष्ट झालेले आहे. शिखराच्या जागी दगड आणि सिमेंट चे छत सुरक्षिततेसाठी तयार केले आहे. मंदिराच्या भिंती,रत्न,पाने,भौमितिक व ग्रासमुखाच्या आकृतींनी सुशोभित आहेत. मंदिराच्या उत्तर,पश्चिम आणि दक्षिणेस मध्यभागी भिंतीवर क्रमशः चंडिका ,सूर्य आणि गणेशप्रतिमा प्रामुख्याने विद्यमान आहेत. 
मंदिराच्या आत दाराची चौकट, छत तसेच आधारस्तंभ यावर अत्यल्प अलंकरण आहे आणि याच्या गर्भगृहाची चौकट पाच शाखायुक्त असून ती वरील बाजूनी नवग्रह तर खालील बाजूस पाने भौमितिक आकारांनी सुशोभित आहे. द्वारशाखेवर एकावर एक दोन मुर्त्या घासल्या गेल्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड जाते . गर्भगृहात एका   नंदीवर बसलेले उमा महेश्वर मूर्ती आहेत. 
याच्या पुरातात्विक महत्त्वामुळे भारतीय पुरातत्व विभागाने यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
शेवटी कॅमेरा मध्ये सगळे फोटो काढून एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही पुढे चाळीसगाव साठी रवाना झालो. बराच वेळ होऊन गेला असल्याकारणाने सगळ्यांना जोरदार भुका लागल्या होत्या.चाळीसगाव मध्ये एका हॉटेल वर थांबून साऊथ इंडियन डिशेश वर  सगळ्यांनी ताव मारला. बराच वेळ झाल्याने आम्ही पुढे पाटणादेवी च्या दिशेने निघालो. वाटेतच श्री क्षेत्र वालझिरी येथील नवनाथ ऋषी मंदिराचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. यावल अभयारण्य एन्ट्री पॉईंट ला एन्ट्री तिकीट घेऊन गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. 

पाटणादेवी मंदिराची माहिती - 


पाटणादेवी हे जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. हे मन्दिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी
ऊंच चौथार्‍यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे.जवळ्च असलेल्या पाटणा य़ा लहान गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य
आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.तिन्हीबाजुने अर्धचन्द्राकार सह्याद्रि पर्वताचे ऊंचकडॆ, विविध वृक्ष, वनस्पति डोंगरातुन खळखळ वाह्णणारे ऒंढे यामुळे मन मोहुन जाते. विशेषत: पावसळ्यात
औगस्ट सप्टेंबरमधे येथील वातावरण मनला प्रसन्नता देणारे, शांत व अल्हाददायक असते. ह्या दिवसात मन्दिरच्या चौथार्‍यावरुन मन्दिराचे भोवतलचा परिसर म्हणजे वनराइने नटलेले पर्वताचे ऊंच कडे, रंगिबेरंगी
फ़ुला – फ़ळानी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळ्खळ वाहनारे ओढे, हे सर्व दृष्य पाहताना मन सर्व गृहस्थी जिवन विसरुन निसर्गाशी
एकरुप झल्याशीवाय राहात नाही. अशा या रमणीय़ ठिकणाचा पुर्व ईतिहास तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे.

मंदिर दर्शन, फोटो काढून झाल्यावर लगेचच पुढे पितळखोरे लेण्या बघण्यासाठी वर चढायला निघालो. थोडे वर  गेल्यावर लगेचच थकवा जाणवू लागला. त्या दिवशी पाऊस नसल्याकारणाने ऊन-सावलीचा खेळ चालू होता,गर्मी वाढली होती. माझे मित्र कैलास,जितेंद्र यांचे चढतांनाचे हाल बघण्यासारखे होते. मी वाल्मिक ,स्वप्नील सोबत चढत होतो आणि मागे कैलास,राहुल आणि जितेंद्र बसत बसत वर  येत होते. २ तासाच्या चढाई नंतर शेवटी आम्ही लेण्याजवळ येऊन पोचलो. वाटेल लागलेल्या पाण्याच्या ओढ्याने सगळे जण प्रसन्न झालेत. लगेचच आम्ही जास्त वेळ वाया न घालता लेण्या बघण्यास सुरुवात केली. 

पितळखोरा लेण्यांची महिती-

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सातमाळा डोंगररांगेत असलेला एकूण १८ लेण्यांचा समूह म्हणजेच पितळखोरा लेण्या. औरंगाबाद पासून ८० किमी आणि चाळीसगाव पासून ३० किमी अंतरावर या लेण्या आहेत . बौद्ध वास्तुकलेचा उत्कृस्ट नमुना म्हणजे पितळखोरा लेण्या. या लेण्यांचे बांधकाम दुसऱ्या शतकात झालेले  असावे असे अभ्यासातून दिसून येते. 
सध्या खान्देशातील चांदोरा टेकडीवर हा लेण्यांचा समूह दिसून येतो. या लेण्या बघत असतांना घेतलेली मेहनत आणि त्याकाळात असलेली कलाकृती लगेच जाणवू लागते. 
या गुहा २ भागात विभागल्या आहेत.पहिल्या भागात १४ चा समूह  आणि दुसऱ्या भागात ४. 
४ चैत्य लेण्या आणि बाकीचे विहार आहेत. सगळ्या लेण्या हिनयना काळातील आहेत आणि उरलेल्या पैंटिंग ६व्या शतकातील महायानां काळातील आहेत. 
सगळ्यात महत्वाची लेणी क्रमांक ३ जी चैत्य गृह म्हणून ओळखली जाते. चैत्यगृहात गुफेच्या दोन्ही बाजूने गोल स्तूप आहेत. या स्तूपांवर अजिंठ्या लेण्यांवर करण्यात आलेल्या पैंटिंग सारखे चित्र आहेत. यातील बरीचशी चित्र हि भगवान गौतम बुद्धाची उभी आणि बसलेल्या स्वरूपातील असून ती अजूनही ठळक स्वरूपात दिसून येतात. 
विहारांमध्ये प्राचीन काळातील सभागृह पद्धत आहेत जिथे गृहाच्या मध्यभागी लहान बैठक व्यवस्था केलेली दिसते. 
लेणी क्रमांक ४ हि खूप सुंदर अजून त्यात जणांसाठी पायर्यांचा चढता मार्ग असून सुरुवातील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन दगडात कोरलेले भले मोठे द्वारपाल दिसून येतात. त्यांचा पेहराव पाहता शाका संस्कृती दिसून येते. प्रवेशद्वाराच्या भिंतीला लागून त्यात दगडावर कोब्रा जातीचे साप कोरलेले आहेत. 
विहाराच्या मध्ये गेल्यावर ९ हत्ती कोरलेले दिसून येतात आणि शेवटी अर्धअश्व स्वरूपातील माणसाची प्रतिकृती दिसून येते ज्यास चौरी असे म्हणतात. समोरच यक्ष प्रतिकृती दिसून येते. 
येथे असलेले दोन शिल्प ( यक्ष आणि गजलक्ष्मी ) मुंबई मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. 
मुंबई वरून पितळखोरा यायचे असल्यास ३६५ किमी अंतर आहेत.


सगळं बघून झाल्यावर बराच वेळ झालेला होता जवळपास दुपारचे दीड  वाजले होते. आम्ही लगेचच खाली उतरायला सुरुवात केली शेवटी परत मंदिराकडे जाताना उजव्या बाजूने वळत  धबधब्या कडे वळलो. काही क्षणात समोर दिसून येतो तो भलामोठा उंच धबधबा. रविवार असल्याने बरीचशी गर्दी दिसत होती. आम्ही सगळ्यांनी सुरक्षेच्या कारणाने आधीपासून पाण्यात न जाण्याचा निर्णय घेतलेला होता. थोडा वेळ थांबून थोडे फोटो काढून जवळपास ४ वाजेच्या दरम्यान आम्ही परतीला  निघालो. वेळेचे अगदी काटेकोर नियोजन करत आम्ही परत एकदा देवीला वंदन करून चाळीसगाव च्या दिशेने निघालो. वाटेत राहुल धुळ्याचा असल्याने त्याला बस स्टॅन्ड ला सोडून कैलास च्या चाळीसगाव येथील घरी आलो . तिथे फ्रेश होऊन चहा भिसकिट खाऊन सोबत पाण्याच्या बाटल्या घेऊन अखेर आम्ही जळगाव च्या दिशेने परत निघालो. 

अमोल देशमुख 
जळगाव 
९९७०३९८६१६
 





 

Wednesday, November 4, 2015

किल्ले कंक्राळा

सालाबादाप्रमाणे दर वर्षी दसर्याचे तोरण यावर्षी सुद्धा बांधून सणांची सुरुवात करण्याचे ठरविले . गडवाट परिवारातर्फे दरवर्षी सह्याद्री मधील दुर्गांवर महाराष्ट्रातील विविध भागांमधून  तोरण बांधायचा उपक्रम आयोजित करण्यात येतो  त्याअंतर्गत यंदा जळगाव-धुळे विभाग मिळून किल्ले कंक्राळा येथे तोरण बांधायचे आम्ही ठरविले. दसर्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या मित्र मंगेश बाविस्कर याच्या घरी धुळ्यात मुक्काम ठोकला. दुसर्या दिवशी पहाटेच निघायचे ठरविले होते. तसे नियोजन रात्रीच करून ठेवले. तोरण बांधायला लागणारे झेंडूची फुल सुई दोरा सुतळी सगळ काही आधीच ब्याग मधे भरून घेतले. सकाळी पहाटेच ५.३० ला मंगेश आणि मी धुळे-सुरत हायवे ने मालेगाव साठी निघालो. मालेगाव म्हटले म्हणजे नाशिक जिल्हा. मालेगाव च्या पश्चिम दिशेला सह्याद्री मधील गाळणा,पिसोळ,डेरमाळ,किंक्राळा सारखे अनेक किल्ले आहेत. यांना दुर्लक्षितच म्हणता येईल. 
धुळ्यामधून किल्ले कंक्राळा येथे जायचे असल्यास थेट मालेगाव रस्ता गाठावा. मालेगाव च्या अलीकडेच १३ किलोमीटर ला कंक्राळा नावाचे गाव आहे. बहुदा किल्ल्याच्या नावावरून गावाचे नाव सुद्धा किंक्राळा पडले असावे. नाशिक मधून या किल्ल्यासाठी यायचे असल्यास मालेगाव-गाळणा रस्त्यावर करंजगव्हाण नावाचे गाव लागते. मालेगाव पासून हे गाव २५ किमी आहे. करंजगव्हाण गावापासून एक रस्ता डावीकडे कंक्राळा या गावासाठी निघतो. करंजगव्हाण पासून कंक्राळा गाव ६ किमी वर आहे . समोरच गेल्यावर गावाच्या मागील बाजून किल्ला दिसून येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी गावातूनच जावे लागते. 
किल्ला चढाई साठी सोपा आहे. पायथ्यापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वार पर्यंत जाण्यास ४५ मिनिट लागतात. चढाई मार्गात बरीच दाट झाडझुडप लागलीत. त्यामुळे नेमका रस्ता कळून येत नव्हता. थोडे वर चढल्यावर किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी दिसून आली. मग लगेचच एका दमात किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ पोहचलो. प्रवेशद्वार चे सुद्धा नुकसान झाले आहे  आणि तिथे बरीच शी झाड आली आहेत. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही लगेच किल्ल्यावर जाऊन पोहचलो . वेळ वाया न घालविता किल्ला फिरायला सुरुवात केली . किल्ल्यावर तसे काहीच अवशेष दिसून येत नाहीत. उजव्या बाजूला वर गेल्यावर महादेव ची पिंड , सोबत नंदी आणि हनुमानाची शेंदूर फसलेली दिसून येते. बहुतेक किल्ल्यावर शंकराचे मंदिर असावे. महादेवाची पिंड आणि नंदी सुबक आहेत. मनुष्यवस्ती आणि गर्दी पासून दूर असलेल्या या देवांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. वाटले कि हेच खरे सुखी देवता. ना इथे कुणाचा मानपान ना  नवसाच्या रांगा . पुढे उजव्या बाजूला वर चढून गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर येउन पोहचलो. तिकडे जाताच समोरच भल्यामोठ्या पिण्याच्या पाण्याच्या ५ टाक्या दिसून येतात. यातल्या २ टाक्या या आकारमानाने खूप मोठ्या आहेत. तिथे थोडावेळ थांबून आम्ही किल्ल्याच्या डाव्या बाजूस निघालो. डाव्या बाजूस गेल्यावर किल्ल्याची पडलेली तटबंदी दिसून येते . उजव्या बाजूला किल्ल्याला वळसा मारला कि खालच्या बाजूला किल्ल्याचे प्र वेश्द्वार दिसून येते आणि समोरच्या बसून डोगरात कोरलेल्या २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात. गावकर्यांनी चुन्याच्या खुणा त्या टाक्यांच्या बाजून करून ठेवल्या आहेत. गावकरी सांगतात कि तेथील पाण्याची पातली कधीच कमी होत नाही आणि बारमाही थंडगार पिण्याचे पाणी तेथे असते. किल्ला उतरताना त्या टाक्यांना भेट देण्याचे आम्ही ठरविले . नंतर आम्ही परत खाली किल्ल्याच्या प्रवेशद्वार जवळ आलो. आणि किल्ल्याला बांधायला लागणारे तोरण बांधायला सुरुवात केली . तोरण बांधून झाल्यावर प्रवेशद्वार समोर आलेली झाड झुडपे मंगेश ने तोडली आणि तोरण बांधायला जागा मोकळी झाली. तोरण बांधून झाल्यावर शिवनामाचा जयघोष करून मंगेश ने गारद दिली . कॅमेरा मध्ये फोटो काढून आठवणी कैद केल्या. थोडावेळ आराम करून किल्ला उतरायला सुरुवात केली. किल्ला उतरत असतांना त्या पिण्याच्या टाक्या दिसतात तिथे आम्ही गेलो. टाक्यांमधील पाण्याने खरच खूप सुखद अनुभव दिला. थंडगार पाण्याने मन तृप्त झाले . थोडा वेळ तेथे विसावा घेऊन गड पुन्हा एकदा निरखून काढला आणि आम्ही गड उतरायला लागलो. 
असा हा उर्लाक्षित आणि उपेक्षित असा किंक्राला किल्ला दसरा तोरण निमीन त्ताने कायम आठवणीत राहील 
अमोल देशमुख
जळगाव
9970398616











दूर्लक्षित किल्ले सुतोंडा

दूर्लक्षित  किल्ले सुतोंडा 
हा एक लहान किल्ला जो
नायगाव चा किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो . दि १६ ऑगस्ट ला मी आणि माझा मित्र मंगेश बाविस्कर  पहाटे ५ ला बाईक ने जळगाव वरून निघालो . जळगाव वरून सुतोंदा अंतर अंदाजे २ तास आहे जवळपास ८० किमी . जळगाव वरून पाचोरा होऊन पुढे बनोटी या गावात पोचलो कि सुतोंडा  किल्ला दिसून येतो . किल्ला चढाई ला सोपा आहे . अंदाजे ४५  मिनिट लागतात. बनोटी गावातून पुढे सरकल्यावर एका डोंगरावर  किल्ल्याचा बुरुज दिसून येतो,किल्ल्यावर जातांना  थोडा वळसा घालून जावे लागते . वर चढून गेल्यावर एक भलामोठा खडक फोडून त्याच्या डाव्या बाजूला दगडात कोरलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसून येते. दरवाज्यातून आत गेल्यावर भुयारी मार्गाने आपण किल्ल्यावर जाऊन पोहचतो. 

येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे ५० फूट लांब , २० फूट रूंद व २० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे १७०० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज व तटबंदी होती, तर तिसर्‍या बाजूला खोल दरी. अरुंद पायर्‍यांवरुन शत्रु ह्या खिंडीत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्‍यांमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत. 

पुढे वर चढून गेल्यावर चारही बाजूने पाण्याच्या टाक्यांचे आणि  लेणींचे थर आहेत व या लेणींचे थरांचाच हा डोंगर आहे. प्रत्येक टाक्याच्या वरची छताची बाजू ही सपाट व मोकळी जागा आढळते. वर उंच डोंगराचा सुळका दिसून येतात . वर टोकांवर दगड रचून केलेल्या भिंती आहेत. किल्ल्यावर असंख्य पिण्याच्या पाण्याच्य टाक्या आहेत आणि त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. किल्ल्यावर बांधकाम केलेल्या इमारतीचे अवशेष सुद्धा दिसून येतात . किल्ल्याच्या उत्तरेस एक चोर दरवाजा दिसून येतो. ज्यामधून तटबंदी पार करून किल्ल्याच्या थेट आत किवा बाहेर प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या तटबंदी ला पकडून फिरत गेल्यास एक टेहाळणी भक्कम बुरुज दिसून येतो. किल्ल्यावर सध्यातरी एवढेच अवशेष दिसून येतात . २-३ तासात   किल्ला आरामात बघून होतो . या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे अखंड दगडात तयार केलेल्या पाण्याच्या टाक्या आणि दगडी भुयारीप्रवेशद्वार. आज इतके वर्ष होऊन सुद्धा हा किल्ला अजूनही आपले वेगळेपण टिकवून आहे पण काहीसा दुर्लक्षित असा हा किल्ला आहे 
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही . पायथ्याशी असलेल्या बनोटी गावात राहून आपण मुक्काम करू शकतो. पिण्याचे पाणी किल्ल्यावर मुबलक आहे. बारही  महिने किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्या फुल असतात . 

किल्ल्यावर जाण्याचा मार्ग 
औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

असा हा किल्ला प्रत्येक इतिहास प्रेमीने एकदा तरी भेट देण्यासारखा आहे .

अमोल देशमुख
जळगाव