Wednesday, June 3, 2015

खांदेरी उंदेरी जलदुर्ग भ्रमंती






रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर असलेल्या किल्ल्यांपैकी जोडी म्हणजे खांदेरी उंदेरी जलदुर्ग . 
मजबूत तटबंदी असलेले शेकडो वर्ष उलटून देखील दिमाखात उभे असलेले जलदुर्ग म्हणजे हे दोन साथीदार . या किल्ल्याचे वैशिष्ट म्हणजे यांची बुलंद तटबंदी जी समुद्राच्या लाटांना दिवस रात्र तोंड देत आहे आणि या दोन्ही किल्ल्यांवर असलेल्या तोफा ज्या अजूनही चांगल्या स्थितीत आहेत . 
२ दिवस मिळालेल्या सुट्टीचा फायदा भटकंती साठी घ्यायचा हे आधीपासूनच मनात होत, पण जलदुर्ग करायची इच्चा जे दुर्मिळ आहेत म्हणून खांदेरी उंदेरी ची निवड केली. बर्याच दिवसांनी हा योगायोग जुळून आला . थेट मुंबई गाठली रविवार सकाळीच निघायचे ठरवले . दोन्ही किल्ले करायचे असल्यास १ दिवस पुरेसा असतो पण त्यासाठी तुम्ही आधी मुंबई मध्ये १ दिवस आधीच असायला हवे. 
मी आणि माझे मुंबई चे २ मित्र जितेंद्र दांडगे आणि अनिल गाढे सोबत होते . सकाळीच गेट वे ला पोहचलो, तिथून अलिबाग साठी बोट ने निघालो, जवळपास १ तासाच्या समुद्र प्रवासानंतर आम्ही मुधवा ला येउन पोहचलो, तेथून अलिबाग साठी जाण्याऱ्या बस मध्ये जाऊन थळ फाट्याला उतरलो. खांदेरी उंदेरी ला जाण्यासाठी आधी थळ गावात जावे लागते जे समुद्र किनार पट्टीवर आहे. थळ फाट्यावरून गावात बाजारपेठ ला यावे लागते. गावातील मासेमारी करणारे त्यांच्या बोटीने किल्ल्यांसाठी घेऊन जातात पण त्यासाठी आधी बुकिंग आवश्यक असते, वेळेवर जरी गेलात तरी कुणी तरी भेटून जाते पण ते पैसे खूप सांगतात . खांदेरी उंदेरी ला मोठा ग्रुप करूनच गेलेले बरे. आम्ही तीनच मित्र असल्याकारणाने आम्हाला १८०० रु द्यावे लागले. दोन्ही किल्ले फिरायचे ठरले, जास्त वेळ वाया  न घालवता आमचा प्रवास सुरु झाला. 
काही गोष्टी खांदेरी उंदेरी ला जातांना लक्ष्यात घ्याव्या लागतात त्या म्हणजे किल्ल्यांवर पिण्याचे पाणी नाही आणि जेवणाचा व्यवस्था सुद्धा तुम्हाला स्वतः करावी लागते. खांदेरी उंदेरी जाण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे पावसाळा सोडला तर कधीही जाऊ शकता. त्यातल्या त्यात उंदेरी किल्ल्यावर जायचे असल्यास भारती ओहोटी च्या वेळा पालव्या लागतात,कारण उंदेरी वर किल्ल्याच्या चारही बाजूंनी खडक आहेत बोट तिकडे थांबविता येत नाहीत म्हणून समुद्रात ओहोटी च्या वेळेत उंदेरी नीट बघता येतो . 
वाटेत थोड समुद्रात मध्ये गेल्यावर नजरेस पडतो तो उंदेरी किल्ला, त्याची तटबंदी पाहूनच त्या किल्ल्याच्या भक्कमतेचि प्रचीती येते. आम्ही आधी खांदेरी ला जायचे ठरवले . उंदेरी पासून थोड पुढे सरकल्यावर खांदेरी किल्ला दिसून येतो, याची तटबंदी सुद्धा तेवढीच बुलंद आणि भक्कम. ४० मिनिटांच्या प्रवास करून आम्ही खांदेरी ला पोहचलो. उतरताच आधी दिसून येतो तो किल्ल्याचा नकाशा , आधी नकाशा बघून आम्ही पूर्ण किल्ला चारही बाजूंनी बघायचे ठरवले. किल्ल्यावर बरेच शे ठिकाण बघण्यासारखे आहेत , सुरवातीलाच वेताळाचे मंदिर लागते आत गेल्यावर तिथे १ शिळा लागते ती मोठी होत जाते असे थळ येथील गावकार्याचे श्रद्धा आहे . होळीच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो , गावकरी येथे आपला नवस फेडायला येतात . 
 डावीकडे असणाऱ्या धक्क्यावरून उतरून आपण दिपगृहकडे निघालो की आपण बाजुलाच झाडांमध्ये हा मध्यम आकाराच खडक दिसतो. छोट्या दगडांनी यावर ठोकून पाहिले असता अक्षरक्ष भांड्यावर ठोकल्या सारखा आवाज येतो. धक्क्यावरून दिपगृहाकडे जातांना दिपगृहाला लागुनच असणारे एक तळे आहे. ते मागे टाकून दिपगृहाच्या बाजूने पुढे जातांना बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. वर पोहचल्यावर आपल्याला दिसते ती गाड्यांवर ठेवलेली तोफ. ही तोफ आकाराने मध्यम असून ती आजही सुस्थित आहे. अशाच दोन तोफा लहान टेकडीच्या बाजूला असणाऱ्या बुरुजावर आहेत. १८६७ मध्ये बांधण्यात आलेले दिपगृह २५ मी. उंचीचे असून षट्कोनी आकाराचे आहे. दिपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दिपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गच्ची लागते. दिपगृहाच्या शिखरावरून किल्ल्याचा मनोरम देखावा आपण पाहू शकतो. दिपगृहाच्या बाजूला तटबंदीवरजिथे हेलिपॅड आहे. तिथेच खाली एक दरवाजा आहे. हादरवाजा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील समुद्राकडे घेऊन जातो. येथून बाहेर पडल्याअर कडेकडेने चालतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजांनी कल्पना येते. याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे एक जुने मंदिर असून गणपति मारुति चे अलिकडे बांधलेले मंदिरे पण आहे. किल्ल्यावर पाण्याचे टाकेसुद्धा आहे. वेताळाच्या मंदिराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीमध्ये एक द्वार आहे. तिथेच एक छोटी खोली आहे.
संपूर्ण किल्ला फिरून झाल्यावर १ गोष्ट मनाला हेलावून टाकणारी होती , किल्ल्यावर असलेल्या दारूच्या बाटल्या आणि पर्यटकांनी केलेला कचरा . 
थोडा वेळ दीपगृहाच्या खाली विश्रांती केल्यावर आम्ही परतीसाठी निघालो, थोडा वेळ बसून अथांग समुद्र दिसून येत होता नंतर उत्सुकता लागून होती ती उंदेरी किल्ल्याची  पण भरतीची वेळ असल्याने तिथे आमची बोट थांबून उतरणे शक्य नवते तरी उंदेरी च्या चारही बाजूंनी बोट फिरवून आम्ही मनसोक्त दर्शन घेतले. किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत दिसून येत होती . किल्ल्याच्या जवळून गेल्यास तिथे ठेवलेल्या तोफ दिसून येतात . शेवटी बराच वेळ झाला होता, उशीर झाला होता, तेथून थळ गावात परत येत असताना दोन्ही जलदुर्ग डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो , थळ  ला पोहचल्यावर गावकर्यांशी थोड्या गप्पा झाल्यावर गावकरी अभिमानाने सांगतात कि हे दोन्ही किल्ले म्हणजे आमची शान आहे. या किल्ल्यान्मुलेच आमची खरी ओळख आहे, अखेरीस गावकर्यांचा निरोप घेऊन मुंबई परतीचा प्रवास सुरु झाला. पण खांदेरी उंदेरी आणि थळ च्या आठवणी कायम स्मरणात राहतील हे नक्कीच .







No comments:

Post a Comment