Friday, August 14, 2020

जळगांव माझ्या नजरेतून

 जळगांव माझ्या नजरेतून 

कोविड  १९ महामारीने तीन महिने घरात बसणं माझ्यासारख्या भटक्याला किती अवघड गेलं असेल याची कल्पना न केलेली बरी . लोकडाऊन असतांना आणि उठल्यावर हफ्त्यातून २-३ दिवस संध्याकाळी फिरणं हे नित्य नियमाचं. फोटोग्राफी म्हटलं कि माझा जीव कि प्राण. घरात बसून फोटो काढून किती काढणार?? आणि कसले काढणार ?? आपल्याला मस्त निसर्गात जाऊन सूर्योदन आणि सूर्यास्त आणि निसर्गाचे फोटो काढायला आवडतात. लोकडाऊन मध्ये मग घरी असल्याने रिकाम्या वेळेचा पुरेपूर सदुपयोग घेत जमेल तेव्हा मोबाईल ने घराजवळील आणि शहरातील ठिकाणांचे बरेच फोटो काढले. त्यातील काही निवडक आणि मला आवडलेले फोटो इकडे ब्लॉग च्या माध्यमांतून तुम्हाला दाखविण्यासाठी हा सगळा प्रपंच. यात असलेले सगळेच फोटो हे मी माझ्या मोबाईल ने काढलेले आहेत. फोटोनंतर ठिकाण कुठल आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. 

अधिक करून फोटोस हे मिरर इमेजेस आहेत. म्हणजे पाऊस पडून गेल्यावर पावसाच्या पाण्यात दिसणारे प्रतिबिंब. यात कुठलीही हेराफेरी केलेली नाही (सॉफ्टवेअर किंवा इतर काहीही वापरलेलं नाही ). सगळेच नैसर्गिक फोटो आहेत. तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा करतो. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे सजेशन माझ्यासाठी मोलाचे ठरतील. त्यासाठी तुम्ही पोस्टवर कंमेंट करू शकता . 

अमोल नंदकिशोर देशमुख 

९९७०३९८६१६



या फोटोच ठिकाण सांगायची गरज वाटत नाही तरी ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी - हे ठिकाण म्हणजे जळगावकरांच्या अगदी जवळचं आणि हक्काचं - मेहरूण तलाव. मित्रांसोबत किंवा परिवारासोबत सकाळ संध्याकाळ किंवा दिवसभरातून कधीही जाऊन थोडा वेळ इकडे घालविला कि सगळं टेन्शन नाहीस होत . माझ्या घरापासून हे ठिकाण फक्त एक किलोमीटर अंतरावर . वाटलं तेव्हा मी इकडे निघून येतो . आणि प्रत्येक वेळेस या तलावाचं आणि परिसराचं रूप मला फोटो घेण्यास भाग पाडत . 

हा फोटो म्हणजे लोकडाऊन मधील अशीच एक निवांत दुपार. तलावाच्या कडेस एकटाच बसलेला हा मनुष्य, न बोलणारा ,स्वतःच्या दुनियेत मग्न दिसून आला. लगेचच यात एक गोस्ट दडलेली मला जाणवली आणि मी मोबाईल काढून फोटो घेतला .जवळून गेल्यावर बघितलं तर हा माणूस कणकेचा गोळा घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे तलावात फेकत होता.खाली पाण्यात बघितल्यावर छोटे छोटे मासे गर्दी करून होते. त्या माणसाच्या मागे तीन  कुत्रीसुद्धा निवांत बसलेली होती . बहुदा त्या माणसाचं तिकडे रोजच येणं जाण असावं असं वाटतं होत. मी सुद्धा बराच वेळ तिकडे थांबून होतो. कणकेचा गोळा संपताच तो माणूस काहीही न बोलता लगेचच निघून गेला. 



वरील फोटो मुद्दाम कृष्णधवल केला आहे . हे ठिकाण मोहाडी रोड वर मंदिराच्या मागे असलेली टेकडी. खाली दिसणारा परिसर म्हणजे खुबचंद साहित्या टॉवर ,डाव्या बाजूला दिसणारी इमारत म्हणजे नवीन बांधण्यात येत असलेलं महिला शासकीय रुग्णालय. फोटो मला खास आवडण्याचं कारण म्हणजे वर आकाशात जमा झालेला एकमेव भलामोठा ढग . 


लोकडाऊन मधील फोटोग्राफी च अजून एक आवडीचं ठिकाण म्हणजे घराची गच्ची . रोज संध्याकाळी वर बसून निवांत सूर्यास्त बघत बसायचं . रोज आकाशात दिसणारे रंग हे दंग करून सोडतात आणि सगळं काही विसरायला भाग पडतात. अशीच एक रंगबिरंगी संध्याकाळ मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न . 



मेहरूण तलाव गणेश घाटावर धुणं धुण्यास आलेली एक महिला. निळ्या आकाशाचं पाण्यात उमटलेलं प्रतिबिंब . 




मेहरूण तलाव गणेश घाटावर धुणं धुण्यास आलेली एक महिला. निळ्या आकाशाचं पाण्यात उमटलेलं प्रतिबिंब .


मेहरूण तलाव परिसरात दुपारी फेरफटका मारायला गेल्यास हा अनुभव नक्कीच येतो. संपूर्ण तलावाभोवती मासे पकडणारी माणसं तुम्हाला नक्कीच दिसून येतील. एक वेळच्या जेवणाची सोय किंवा मासे विक्री करून उदरनिर्वाह करणारी बरीच कुटुंब या तलावावर अवलंबून आहेत. बऱ्याच कुटुंबाचं पालनहार म्हणून देखील मेहरूण तलावाची ओळख आहे . 






जॉगिंग ट्रॅक सोबत सूर्य नारायणाची जमिनीवर पडलेली सोनेरी  किरण .




मेहरूण तलाव परिसरात संध्याकाळी भरून आलेलं आभाळ .





मोहाडी रोड आणि लांडोरखोरी परीसर हा सायकलींग आणि पायी फिरणाऱ्यांसाठी कायम वर्दळीचा. पाऊस पडून गेल्यावर या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात जणू आकाश जमीनीवर येऊन ठेपलाय असा भास मला झाला, लगेचच मोबईल मध्ये मिह क्षण कैद केला . 






गिरणा पंपिंग रोड ,रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या सिमेंट दुकानाला लागून साचलेल्या पाण्यात घराचे प्रतिबिंब 



रिकाम्या पडलेल्या रेल्वे रुळांवर पावसामूळे पाणी साचलेले आढळलं .मग त्याच पाण्याचा उपयोग करत माझ्या मित्राचे प्रतिबिंब फोटोत कैद करण्याचा प्रयत्न .



वरील सर्व फोटो जळगांव च्या विविध भागांमध्ये मोबाईल च्यासहाय्याने घेतलेले आहे. यासाठी फिरणं आणि तुमचं निरीक्षण महत्वाचं . जिथे कुठं स्वच्च पाणी साचलेलं दिसेल तिथे चांगली फ्रेम किंवा फोटो काढता येईल का हे मी बघतो . फोटो मध्ये एखादा ऑब्जेक्ट असला तर फोटो अधिक बोलका दिसतो . त्यासाठी प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला काहीतरी दिसेलच . वरील सर्व फोटो हे मोबाइल मध्ये काढलेले आहेत . 




                                                            मेहरूण तलाव परिसर


मेहरूण तलाव परिसर


    
                                                                    मेहरूण तलाव परिसर




एक नयनरम्य संध्याकाळ आणि ढगांमधून पडणारा पाऊस 


    
                  मेहरूण तलाव परिसर एक नयनरम्य संध्याकाळ 




मोहाडी गावानजीक असलेल्या डोंगरावरून दिसणारा परिसर. समोर भरून आलेला आभाळ. 




मोहाडी रोड आणि लांडोरखोरी परीसर हा सायकलींग आणि पायी फिरणाऱ्यांसाठी कायम वर्दळीचा. पाऊस पडून गेल्यावर या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडलेल प्रतिबिंब , लगेचच मोबईल मध्ये मिह क्षण कैद केला . 




ए . टी . झांबरे विद्यालयसमोर साचलेल्या पाण्यात पडलेलं (फोटो मोबाईल उलटा करून बघा )




मेहरूण तलाव परिसर मध्ये सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी झालेली गर्दी ( फोटो मोबाईल उलटा करून बघा )



                                                    कोल्हे हिल्स कडे जाणारा रस्ता 


मेहरूण तलाव परिसर ( मित्राचं पाण्यात पडलेले प्रतिबिंब )


गिरणा पंपिंग रोड ,रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या सिमेंट दुकानाला लागून साचलेल्या पाण्यात घराचे प्रतिबिंब 


गिरणा पंपिंग रोड 



गिरणा पंपिंग रोड ,रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या सिमेंट दुकानाला लागून साचलेल्या पाण्यात कुत्रा निवांत बसून होता  त्याच पाण्यात पडलेलं प्रतिबिंब ( फोटो मोबाईल उलटा करून बघा )



गणेश घाटाच्या भिंतीवर बसून मासे पकडतांना मुलगा

अशी अजून अनेक वेगवेगळ्या परिसराची फोटो मालिका तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. जर खरंच तुम्हाला आवड असेल तर आहे त्या उपकरणाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आजूबाजूचं सौंदर्य तुमच्या मोबाईल मध्ये कैद करू शकता. मी माझ्या परीने केलेला हा छोटासा प्रयत्न . आपणास काही सूचना ,जागा किंवा इतर काही गोष्टी सुचवायच्या असतील तर कृपया नक्की कळवा . तुम्ही मला कॉल ,msg किंवा मेल करू शकता .  

अमोल देशमुख

९९७०३९८६१६

amol2050@gmail.com

Instagram Id - amol2050

Tuesday, June 2, 2020

भंडारदरा - लोकजीवन

भंडारदरा - लोकजीवन 

भंडारदरा - महाराष्ट्रातील स्वर्ग अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.पश्चिम घाटाचा हा परिसर आणि त्याच सौदर्य अमाप आहे. महाराष्ट्राला हि मोठी निसर्गाने दिलेली देणगीच म्हणता येईल.
भंडारदरा परिसर जरी निसर्गसंपन्न असला तरी विकासाच्या दृष्टीने अजूनही मागेच आहे.इथे राहणारे आदिवासी आणि इतर बांधव अजूनही मुळ गराजांपासून वंचित.तरीदेखील हि लोक इथे एकदम सुखात राहतात.यांचं मुख्य उत्पन्न म्हणजे भात याला कारण एकच इथे पडणारा पाऊस.

पावसाचा काहीं काळ सोडला तर बाकी इतर महिने यांच्यासाठी कठीण असतात.सध्या पुण्या मुंबई वरून विकेंड ला येनर्याचा ओघ इकडे बराच वाढलाय आणि त्याचाच फायदा घेत इथे २-४ पैसे हे लोक पावसाळी पर्यटनातून कमावतात.

हा फोटो म्हणजे भंडारदरा परिसरातील एका शेतात राखण करणाऱ्या मुलीचा.मागे दिसणारा भंडारदरा जलाशय.
मुलीच्या कपड्यावरून कल्पना करता येईल की शाळेचा गणवेश . हाच दिवसभर घालून दिवस काढायचा.
शहरी लोकांसारखे दिवसातून २-३ ड्रेस सकाळ संध्याकाळ रात्र या प्रमाणे यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात.म्हणून आहे त्यात ही लोक आनंद मानतात.

अठरा विश्व दारिद्र्य असूनदेखील चेहऱ्यावरील हास्य कमी होऊ न देणारी हि लोक कोरोना सारख्या कठीण काळात जगण्याची ऊर्जा देऊन जातात.

आयुष्य सुंदर आहे ☺️ 

फोटो साभार - ऋषिकेश जाधव 

Tuesday, March 10, 2020

गोदाकाठ- नाशिक

नाशिक एक स्वछ आणि सुंदर शहर,याची खरी सुंदरता अनुभवायची असेल तर ती रात्री देखील अनुभवता येते. शहरात येणार प्रत्येक भटका किंवा पाहुणा हा पंचवटी परिसराला भेट दिल्याखेरीज जात नाही.सहसा दिवसभर हा गोदावरी चा परिसर खूपच भाविकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. मनात आले कि रात्री हा कसा असेल किंवा निर्मनुष्य असल्यावर कसा दिसेल म्हणून एके दिवशी रात्री १२ नंतर गोदातिरेवर गेलो. एक वेगळं आयुष्य अनुभवत होतो. ज्यांना कुणाला निवारा नाही अश्या असंख्य लोकांची किंवा कामानिमित्त शहरात आलेल्यांची, अपंग लोकांची, दारिद्र्य रेषेखालील लोकांची निवार्याची सोय हा परिसर करत असतो. शेकडो कुटुंब या परिसरात तुम्हाला रात्री थिरावलेले दिसतील. असाच एक माणूस  निवांत निद्रावस्तेथ असताना चा हा फोटो मला खूपच भावला आणि लगेचच बर्याचश्या गोष्टींचा उलगडा डोळ्यासमोर आला.
Copyright of Photograph - Mr.Amol N Deshmukh

खान्देशातील दुर्गवैभव - किल्ले चौगाव


खान्देशातील विशेषकरून पूर्व खान्देशातील ( जळगाव जिल्ह्यातील ) किल्ल्यांवर फारसे कोणी लिहिलेले नाही.राजदेहेर,पारोळा व अमळनेरवरच फारच थोडे लिहिले गेले.त्यामुळे जिल्ह्यातील माहिती वाचकांना नाही.
जिल्ह्यात जे काही किल्ले आहेत ते एकतर गवळीराजकालीन (आभिरकालीन),फारुकीकालीन व पेशव्यांच्या उत्तरकाळातील आहेत. त्यामुळे बहमनी , आदिलशाही व निजामशाहीत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात जसे मोठाले किल्ले बांधले गेले आहेत तसे जळगाव जिल्ह्यात नाहीत. जिल्ह्यात एकूण २७-२८ किल्ले-गढ्या आहेत. यांच्यावर घडामोडी घडल्याच नाहीत, असे नाही. यातील १२ किल्ल्यांवर तर ब्रीतीशांशी चकमकी झालेल्या आहेत.
इ.स. १८१८ मध्ये ब्रिग्ज याला खानदेशाचा कमिशनर नेमल्यानंतर त्याने खानदेशाचा सर्व भाग आपल्या पायाखाली घातला. त्याने “दि लाईफ एंड कॅन्डीशन ऑफ खान्देश पिपल” या नावाचा एक मोठा अहवाल तयार केला आणि तो मुंबई च्या गोवेर्नेर ला पाठविला. यात ब्रिग्ज लिहितो कि खान्देश चा इतिहास हा फारसा लिखित स्वरुपात उपलब्द नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांना महत्व आले;पण खान्देशमधील सर्व गिरिदुर्ग हे यादव किवा यादवपूर्वकालीन आहेत.बहामनी काळात हे किल्ले आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बराच संघर्ष खान्देश भागात झालेला आपणास दिसून येतो. या संघर्षाचे काही उल्लेख मुसलमानी इतिहासकारांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथात आपणास आढळतात; परुंतू दुर्दैवाने या गोष्टींचे फारसे संशोधन झाले नाही.धुळे,जळगाव,नंदुरबार जिल्ह्यातील किल्ले,गढ्या आणि तेथील इतिहास हा सतत उपेक्षितच राहिला.
खान्देशातीत विशेषता जळगाव जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यांमध्ये प्राचीन असा किल्ला म्हणजे चौगाव चा किल्ला. दक्षिणेतून मध्यप्रदेशात ( नेमाडत ) जाणार्या मार्गावरील हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा तर आहेच;परंतु उत्तर,मध्यप्रांतातून दक्षिणेतील सुरत, भडोच बंदरातून भारताबाहेर निर्यात होणार्या मालासाठी बाजारपेठ म्हणूनही चौगावाचे महत्व वर्णन केले आहे.
गडवाट परिवाराच्या वतीने यंदा राज्यभरात विभागावर किल्ल्यांवर वृक्षारोपण आयोजित केले होते. जळगाव विभागात दुर्लक्षित अश्या चौगाव किल्ल्याची माहिती मिळाली आणि लगेचच किल्ल्याला जायचं ठरलं.
किल्ल्याच्या पायथ्याला चौगाव वसलेले आहे . जळगाव जील्यातील चोपडा तालुक्यात वायव्येस ११ किमी लांब चौगाव येत.या गावाजवळ सातपुडा पर्वत येतो,पर्वताच्या दक्षिणेकडे आलेल्या एका सुळक्यावर गवळी राजवटीतील प्राचीन किल्ला आहे. तो मध्य प्रदेशात ( नेमाडत ) जाणर्या अतिप्राचीन भिराट घाट या डोंगरी मार्गावर आहे. गडाच्या पायथ्याशी तीन नद्या वा नाले एकत्र येऊन मिळतात.तेथे प्राचीन महादेवाचे मंदिर होते आता त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिराजवळ सपाट जागेवर दगड विटांचे ढिगारे दिसतात.पूर्वीच्या काळी बहुतेक किल्ल्यांच्या खाली असे बाजारहाटाचे केंद्र आढळून येई.गडाच्या उजव्या व डाव्या बाजूस मोठ्या चीपात्या,बांदरा बल्ल्या ,लेभाग डोंगर ,काली टेकडी , मास्तरना बल्ल्या ( अहिराणी भाषेत बल्ल्या म्हणजे डोंगर )हे सातपुडा रांगेतील डोंगर आहेत.किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. एक दक्षिणेकडे गडावर चढतांना दक्षिण दरवाजा चटकन लक्षात येणार नाही अश्या रीतीने तो बांधला आहे. हा दरवाजा अजून शाबूत आहे. दरवाज्याच्या बाहेरील बाजूस संरक्षक तटभिंतीत एक मोठे खोदीव टाके आहे .हे पाण्याचे टाके पुरातन लेणे असावे. लेण्यात एका रांगेत तीन स्तंभ अश्या समोरील दोन स्तंभावल्या दिसतात. अंधारामुळे आतील काहीच दिसत नसल्यामुळे आणखी किती स्तंभ मागे आहेत हे समजू शकत नाही. या स्तंभांनी छतास आधार दिलेला आहे .
गडावर दोन वाद्यांचे अवशेष आहेत. दक्षिण प्रवेशद्वारातून डाव्या बाजूस एका वाड्याचे चौथरे दिसतात.हा वाडा डोंगराच्या कडेवर असल्यामुळे येथून खालील प्रदेशाचे दृष्य मनोहारी दिसते. वाड्यास लागून एक हौद व एका देवीच्या देवळाचा चौथरा आहे . या वाड्याच्या बाजूने पुढे गेल्यास चार खोदीव टाक्यांचा समूह दिसून येतो. या टाक्यांमध्ये पाणी काठोकाठ भरलेले असते. त्यामुळे गडावरील वस्ती व शिबंदिस पाणी मुबलक प्रमाणात मिळत असावे .टाक्यांच्या पुढे गेल्यावर एक प्रशस्त ( सुमारे ५० मी लांब x २५ मी रुंद ) असा एक वाडा आहे .त्यास गवळीवाडा असे म्हणतात . वाड्याच्या चहुबाजूने भिंती शाबूत असून वरचे छत तेवढे आज शिल्लक नाही. छताच्या या भिंतीच्या अगदी वर हवा ये जा करण्यासाठी केलेली सोय वाखाणण्यासारखी आहे. वाड्याचे प्रवेशद्वार विचित्र आहे.समोरून वाड्यातील काहीही दिसणार नाही, अशी त्याची रचना आहे. वाड्यासमोरील मोकळ्या जागेत १९७७ मध्ये ६ फुट लांबीच्या चार जुन्या तोफा सापडल्या असून त्या सध्या चोपडा तहसीलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत. वाड्याच्या  उत्तरेला उत्तर दरवाजा दिसून येतो .पडक्या अवस्थेत असला तरी बर्यापैकी शाबूत आहे .
किल्ल्यातील वस्तूंचा संशोधनात्मक अभ्यास केल्यास बर्याच गोष्टीचा आणि अपरिचित इतिहासावर प्रकाश पडू शकतो .

किल्ला चढायला सोपा असून पायथ्यापासून चढाई साठी ४० मिनिट लागतात. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे सोबत मुबलक पाणी असणे आवश्यक आहे.
किल्ल्याला भेट द्यायची असल्यास जळगाव वरून चोपडा मार्गे चौगाव ला येऊ शकतात. पायथ्याला असलेल्या गावात जेवणाची सोय होऊ शकते. किल्ला पूर्ण बघायला २ ३ तास वेळ लागतो.
अश्या या अपरिचित किल्ल्यास अभ्यासक मंडळीनी नक्की भेट द्यायला हवी.  
अमोल देशमुख












भविष्यातील संगणक तंत्रज्ञान

आज आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तंत्रज्ञान चा संबंध हा येत असतोच. सुरुवात हि भ्रमणध्वनी पासून होते. अन्न वस्त्र आणि निवारा सोबतच भ्रमणध्वनी आणि इंटरनेट हि माणसाची गरजच बनून गेली आहे. बर्याच आवश्यक गोष्टी आपण घरबसल्या अगदी काही क्षणात भ्रमणध्वनी च्या सहाय्याने पूर्ण करू शकतो.सोबतच फोर जी सारख्या तंत्रज्ञान आज सहजरीत्या भारतात शहरी आणि खेडोपाडी आल्याने एक वेगळी क्रांती झाल्याच आपल्याला दिसून येते. गेल्या दहा पंधरा वर्षात तंत्रज्ञान ज्या झपाट्याने वाढत जात आहे त्याचा वेग बघता माणूस विकासाच्या एका वेगळ्या पातळीवर येऊन पोचला आहे.
या तंत्रज्ञान चा फायदा हा देशाच्या तळागाळातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी व्हायला होणे गरजचे आहे आणि तेच या तंत्रज्ञान चे फलित असले पाहिजे.
संगणक हा देखील मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होऊ पहात आहे किबहुना झालाच आहे असे आपण म्हणू शकतो. आणि संगणक क्षेत्रात जालेल्या तंत्रज्ञान बदलामुळे आज जग एका वेगळ्या वळणावर येऊन पोचले आहे. आज शिक्षण असो किवा विज्ञान,सरकारी क्षेत्र, बँक,खाजगी नोकरी,वैद्यकीय क्षेत्र ,कला आणि क्रीडा,साहित्य,खेळ,वेगवेगळ्या अवकाश मिहीमा,अणु उर्जा अगदी प्रत्येक क्षेत्रात संगणक तंत्रज्ञान येऊन पोचले आहे. यातच भर म्हणून भविष्यात येणर्या तंत्रज्ञान मुळे मनुष्यप्राणी हा आपल्या प्रगतीचे आलेख अधिकाधिक उंचावणार आहे. अगदी आपल्या काल्पनेपलीकडील गोष्टी ज्या कधीकाळी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी शक्य करण्याच काम या तंत्रज्ञान ने केलं आहे किबहुना भविष्यात अजून करणार आहे.
अश्याच काही भविष्यात येणाऱ्या निवडक संगणक तंत्रज्ञान ज्यामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडून येतील या बद्दल आपण बोलूयात
पाहिलं महत्वाच तंत्रज्ञान म्हणजे  Internet of things
यात जीवनावश्यक असलेल्या प्रत्येक वस्तू या सेन्सोर च्या मदतीने इंटरनेट शी जोडल्या जातील आणि मानवाच्या सहभागाविना काही गोष्टी पूर्ण करता येतील. जसे कि स्मार्ट होम ( हुशार घर ) ज्यात घराची सुरक्षा,घरात वापरल्या जाणार्या चैनीच्या वस्तू चालू बंद करण्याच नियोजन हे तंत्रज्ञान आपोआप करेल यामुळे घरात वापरली जाणारी उर्जा वाचविली जाऊ शकणार आहे.
हे तंत्रज्ञान फक्त घरगुती वापरासाठी मर्यदित न राहता ते वेगवेगळ्या क्षेत्रात वापरले जाऊ शकत आणि हे वापरात देखील येत आहे जसे कि कृषी क्षेत्र,बांधकाम,सुरक्षा,दळणवळण,भारतीय भूदल,वैद्यकीय क्षेत्र,उद्योग,उर्जा व्यवस्थापन,पर्यवरण संतुलन  इत्यादी.
दुसरं आणि अत्यंत महत्वाचे तंत्रज्ञान म्हणजे artificial intelligence ज्यालाच machine learning सुद्धा म्हटले जाते. यात यंत्र हे मानवाप्रमाणे विचार करू शकतात आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्या परीने शोधू शकतात. हे एका प्रकारे चमत्कारी आहे. यावर बर्याच खाजगी संस्था सध्या काम करत आहेत. भारतात देखील काही शाळामध्ये मुलांना शिकविण्यासाठी रोबोट वापरले जात आहेत ज्यात हे तंत्रज्ञान वापरले जात आहे.याचे फायदे हे बर्याच क्षेत्रांना होणार आहेत जसे कि संगणक खेळ,खागोल्शाश्त्र,औषध,वाहतूक ,कृषी ,शिक्षण,करमणूक ,माहिती तंत्रज्ञान,सामजिक मध्यम,नेक इत्यादी.आणि याच्या सीमा या अधिकाधिक विस्तारत आहेत.
पुढील काळात मानवासोबत रोबोट म्हणजेच कृत्रिम मानवी यंत्र काम करेल, माणसासोबत वेळ व्यतीत करेल. मानवाला असलेल्या भावना,भाव ते प्रकट करू शकेल.पुढील येत्या काळात युवा वर्ग आपला सहचारी म्हणून देखील या यंत्राचा वापर करतील.
जगभरातील मोठमोठ्या खाजगी कंपन्या यावर काम करीत आहेत.भारतीय संगणक क्षेत्रात देखील या तंत्रज्ञान चा प्रभाव येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणत दिसून येणार आहे.

पुढील तंत्रज्ञान म्हणजे बिग डाटा
पुढील येत्या काळात डेटा म्हणजेच माहिती हे खूप मोठा कामगिरी पार पडणार आहे.बिग डेटा म्हणजेच प्रचंड मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली  माहिती. याच माहितीवर प्रक्रिया करून अपेक्षित निकाल मिळविणे म्हणजेच बिग डेटा analitics.हि प्रचंड प्रमाणात साठविलेली माहिती या आधी असलेल्या संगणकावर प्रकिया करणे अशक्य होते फेसबुक ,ओर्याकल ,गुगल ,अमेझोन सारख्या मोठ्मोत्या कंपन्या या क्षेतात काम करत आहेत. भविष्यात यात नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणत उपलब्ध होणार आहेत.
बिग डाटा हे भविष्यात किबहुना आताच वैद्यकीय ,हॉटेल ,सार्वजनिक सुविधा क्षेत्र,सरकारी ,शिक्षण,करमणूक,हवामान अंदाज,दळणवळण,बँक इत्यादी क्षेत्रात वापरले जाईल.
गुगल फेसबुक,इंस्ताग्राम सारख्या कंपन्या आपल्या वयक्तिक माहितीचा वापर करून आपल्या आवडी निवडी ठरवतील आणि अश्याच वस्तू एखाद्या विशिष्ट संकेत स्थळावरून आपल्याला विकत घेण्यास भाग पडतील.याचे उत्तम उदाहरण म्हणजे youtube उघडल्या उघडल्या दिसणारे विदिओ. आपल्याला जे आवडत तेच आपल्या समोर मांडल जाईल. या सगळ्या गोष्टी आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करून केल्या जातात त्याला संगणकी भाषेत डाटा analytics म्हणतात.
Augmented Reality म्हणजेच वर्धित वास्तव 
या तंत्रज्ञानात वास्तविक जग आणि cyberspace म्हणजेच इंटरनेट एकमेक्कांना संलग्नित केलं जाईल.यात भ्रमणध्वनी असलेले gps तंत्रज्ञान आणि माहिती यांचा वापर करून tablet किवा भ्रमणध्वनी च्या सहाय्याने आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण बघू शकतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे रिकाम्या घरात शोभेच्या वस्तू घ्यायच्या असतील तर tablet वर त्या वस्तू घरात कश्या दिसतील हे तुम्हाला दिसून येईल. जेणेकरून तुम्ही ते खरेदी करू शकता.याचप्रमाणे एखादी इमारत ,व्यक्ती किवा इतर काही माहिती तुम्हाला याद्वारे अचूक मिळू शकेल.

याचबरोबर genetic इंगीनीरिंग, quantum computing सारखे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणत विकसित आणि वापरात येतील.यामुळे वेळ,पैसा आणि मेहनत या तीनही गोष्टी मध्ये बचत होऊ शकेल.5g-6g तंत्रज्ञान मुळे जग अधिक वेगाने एकमेकांशी जोडलं जाईल आणि तंत्रज्ञान अधिकाधिक वेगाने विकसित होईल.२०२१ मध्ये अमेरिकेत पहिला रोबोट येईल जो औषधं उत्पादन कंपनी मध्ये काम करेल.२०२२ पर्यंत जगातील १० टक्के लोकसंक्या इंटरनेट शी जोडले जाणारे कपडे वापरतील.3d प्रिंटींग तंत्रज्ञान वापरून बनविलेल्या चारचाकी २०२२ पर्यंत बाजारात येतील.माणसाच्या शरीरात मुद्रित केलेला पहिला मोबाईल २०२३ मध्ये वापरत येईल.सरकार आपल्या जनगणनेत बिग deta चा पवापर सुरु करेल.२०२३ पर्यंत १० टक्के चष्मे इंटरनेट शी जोडले जातील.सरकार कर आकारणी साठी ब्लोक चेन तंत्रज्ञान वापरेल.२०२३ पर्यंत जगातील ९० टक्के लोकांकडे सुपेर्कॉम्पुतर असेल.२०२४ पर्यंत इंटरनेट चा वापर हा मानवाचा मुलभूत अधिकार असेल.३ओ टक्के corporate audit हे artificial intelligence च्या सहाय्याने केले जाईल.जागतिक स्तरावर केल्या जाणार्या यात्रा या उबेर सारख्या माध्यमांद्वारे शरिंग (sharing)करून केल्याजातील.खाजगी वाहनाचा वापर कमी होईल. असे बरेच उदाहरण देता येतील.या सगळ्यांमध्ये संगणकाचा मोठा हातभार असेलच.संगणकाशिवाय हे तंत्रज्ञान विकसिक होण मुश्कील आहे. मानवी जीवनात क्रांती घडून आणण्याच काम वरील तंत्रज्ञान करतील पण महत्वाच म्हणजे हे जेवढ सुखकारक आहे तेवढंच धोक्याची घंटा देणार सुद्धा आहे.
या येणाऱ्या तंत्रज्ञान मुळे बर्याच नोकर्या जातील. मानवाची जागा रोबोट घेतील. ज्यांना कुणाला तंत्रज्ञान माहिती असेल किवा हाताळता येईल त्यांना नोकरी च्या सुवर्णसंध्या भविष्यात असतील.संगणक तंत्रज्ञान भविष्यात मानवासाठी वरदान घेऊन येतील. फक्त याचा वापर समाजातील गरीब , वंचित लोकांचे जीवनमान,शिक्षण आणि इतर संधी उपलब्ध होण्यासाठी झाला तर माणूस खर्या अर्थाने प्रगत झाला किवा होईल असे आपण म्हणू शकू.
भारत देखील जागतिक पातळीवर प्रगतीपथावर आहेच आणि संगणक क्षेत्रात तर अग्रेसर आहेच आहे आणि भविष्यात सुद्धा राहील.
अमोल नंदकिशोर देशमुख
९९७०३९८६१६
नाशिक